Mahabharatatil Dharma va Niti Vichar
महर्षी व्यासांचा धर्म व नीतिविषयक ज्ञानाने ओतप्रोत भरलेला विशाल ग्रंथराज भारतीय संस्कृतीचा अमोल ठेवा आहे. धर्माची तत्त्वे व नैतिक मूल्ये यांची सखोल चर्चा या ग्रंथात अठराही पर्वांत जागोजागी केलेली आढळते; ती भगवद्गीतेपुरतीच मर्यादित नाही. इतकी विस्तृत व मूलगामी चर्चा इतरत्र कुठेही आढळत नाही. मूळ संविधानक कुरुवंशातल्या कौरव-पांडवांच्या संघर्षावर आधारित आहे.
शरशय्येवरून भीष्मांनी धर्मराजाला दिलेले ज्ञान, विदुरनीती, यक्ष प्रश्न, अनेक ऋषींचे उपदेश, हंसगीता, अनुगीता, विविध उपाख्याने, धर्माच्या तीन सत्त्वपरीक्षा, वेदान्तातील दार्शनिक विचार, कर्मसिद्धान्त इत्यादींमधून धर्म व नीती यांचे विचारधन या महाकाव्यात मांडले आहे. ह्या विचारधनाचा, लेखकाने प्रस्तुत ग्रंथात सविस्तरपणे परामर्श घेतला आहे. भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य वाणीने अर्जुनाला केलेला गीतोपदेश हा व्यासांच्या संहितेचा मुकुटमणी होय. ह्या प्रदीर्घ दिव्य उपदेशाचे विवरण लेखकाने येथे लेखांक एक्कावन्न ते चौसष्ट यांत केले आहे. महाभारतातील ‘सूक्ष्म धर्माचे’ विवेचन म्हणजे धर्मसंकल्पनेवर नवीन प्रकाश टाकल्यासारखे आहे; त्याचाही इथे मागोवा घेतला आहे. रसिक वाचकांना ह्या धर्म विवेचनातून उद्बोधन मिळावे, हेच या लिखाणाचे उद्दिष्ट आहे.
✻