Phule-Ambedkari Vangmay Kosh
सामाजिक-सांस्कृतिक जीवनात प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध एखादे बंड झाले की, त्यातून समाज आणि साहित्य यांना नवी मूल्ये प्राप्त होत असतात. एकोणिसाव्या शतकात जोतीराव फुले आणि विसाव्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशा एका बंडाचा प्रारंभ केला. फुले-आंबेडकरी प्रेरणेतून निर्माण झालेल्या वाङ्मयाला दलित वा फुले-आंबेडकरी वाङ्मय असे संबोधले जाते. या वाङ्मयाचे स्वरूप आणि मूल्ये यांचे विवेचन, तसेच आंबेडकरी विचार आणि साहित्यिक यांच्या योगदानाविषयीचे विस्तृत विवेचन हा या कोशाचा गाभा आहे.
ज्या भाषेत विविध विषयांच्या कोशाची निर्मिती होते, ती भाषा ज्ञानक्षेत्रात संपन्न बनते. हा कोश म्हणजे ज्ञानक्षेत्रातील मराठी भाषेचा महत्त्वपूर्ण हस्तक्षेप असून संस्कृती आणि विचार यांचे संचित आहे. या कोशातील ज्ञान-संकलन अधिकृत आणि मान्यताप्राप्त माहितीवर अधिष्ठित असून गरजेनुसार ससंदर्भ चर्चा केलेली आहे.
सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक आणि ज्ञानविज्ञानपर इयत्तेचा ठसा या कोशाच्या अंतर्बाह्य स्वरूपावर उमटला आहे. कोशातील नोंदींचे स्वरूप जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ असून विषयाच्या स्वभावानुरूप त्यांची रचना केलेली आहे.
आंबेडकरपूर्व, आंबेडकरकालीन आणि आंबेडकरोत्तर कालखंडातील सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाचे स्वरूप, या कालखंडातील वाङ्मय, लेखकांचे योगदान या विषयी अधिकृत, विश्वसनीय माहिती आणि एक महत्त्वाचा ज्ञानस्रोत म्हणजे फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश!
✻